Wednesday, 8 August 2018

बोकोबा आणि लोणी

आज सकाळचीच गोष्ट. बरे नसले कि अभिनयासकट गोष्ट रंगवून सांगत खाऊ भरवावा लागतो तरच तो जातो.
आजी आणि आबा मिळून युगंधरला कृष्ण आणि दहीहंडीची गोष्ट सांगत होते. कंस कसा दुष्ट होता सगळे गोकुळातले दूध त्याच्याकडे मागवायचा आणि कधी घाबरून तर कधी चांगल्या मोबदल्यासाठी मग गोकुळातले लोकही आपल्या पोराबाळांना खाऊ-पिऊ न देता दूध-दुभते तिकडे पोहोचते करायचे. त्याच्या मित्रांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता. आणि हे अन्यायाचेही होते.
दही गुसळून केलेलं लोणी शिंकाळ्यावर काढून ठेवायचे. ते असे वर बांधलेले असायचे. गोष्ट जोरात सुरु होती.
"शिंकाळे म्हणजे काय?"
एवढ्यात जिया म्हणजे आजी काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेली. आणि
आबांनी 'शिंकाळे' या गोष्टीचे सगळे दाखले द्यायला सुरुवात केली.
म्हणजे
"अरे ते नाही का तू खूप मस्ती करतोस तेव्हा बाबा म्हणतो ना 'शिंकाळ्यावर टांगून ठेवीन'. आणि अरे ती म्हण आहे ना 'बोकोबाची नजर शिंकाळ्यावरच्या लोण्यावर'. म्हणजे अरे बोकोबा असतो ना त्याचे घरात सगळीकडे लक्ष असते. लोणी करताना तो बघतो आणि मग वाट बघत असतो कि कधी मला त्यावर ताव मारता येईल."
यांचे हे 'शिंकाळा' पुराण संपता संपता आजी आली आतून आणि मग कृष्ण आणि त्याचे साथीदार यांच्या गप्पा गोष्टी परत चालू झाल्या.
" तर अरे कृष्ण म्हणजे गोकुळचा राजाच. त्याच्याकडे दुधातुपाला काही कमी नव्हती. पण आपल्या सवंगड्याना ते मिळावे म्हणून मात्र तो त्यांच्या घरी जाऊन कोणी घरी नाहीसे पाहून चोरी करत असे. म्हणजे काय असे खाली ४-५ जणांनी उभे राहायचे त्यावर अजून थोडे मग त्यांच्या खांद्यावर अजून काही मुलं असा पिरॅमिड करायचे आणि सरते शेवटी कृष्ण वर चढून ते लोण्याचे मडके खाली आणायचा आणि मग आपल्या सर्व मित्रांना आपल्या हातानं प्रेमाने यथेच्छ खाऊ घालायचा. "
"आणि मग त्या बोक्याला दिल कि नाही."
"ऑ , कुठल्या बोक्याला ?" आजी बुचकळ्यातच पडली.
मग आबांनी त्याला ती म्हण आत्ताच सांगितल्याचे सांगितले आणि आम्ही सर्व हास्य कल्लोळात बुडून गेलो.
किती निरागस असते चिमुकल्यांचे भावविश्व. खूप सगळ्या गोष्टी त्यात सहज सांधलेल्या असतात. आपल्या वाटते ही कुठली लिंक कुठे आली पण प्रत्येकच गोष्टीमागचे त्यांचे विचार सुसंगत असतात आणि त्यांना त्यांची त्यांची यथायोग्य कारणंही असतात.
युगंधरच्या जन्माच्या आधीचे माझे आणि कौशलचे फोटो कधी पहिले तर जरा रागच यायचा युगंधरला. 'तू तेव्हा नव्हतास' असले सत्य तर अजिबात आवडायचे नाही. 'जवळच खेळत असशील' असे सांगणेही पटायचे नाही.
"मग तुम्ही मला न बोलावता आपला आपला फोटो काढलात ना" असले गम्मत आणि ज्याचे तुम्ही काही केल्या सांत्वनच करू शकत नाही असे भांडण सुरु व्हायचे.
मग मीही फार फाटे न फोडता 'अरे तू आहेस फोटोत पण माझ्या पोटात आहेस' असे सांगायला सुरुवात केली. आणि पोटात का होईना पण आपण आहोत फोटोत असल्या गमतीशीर समाधानात पुढे पुढे असले प्रश्न बंद झाले.
मग एकदा आईच्या घरी कुठलेसे फोटो बघत होतो. एका फोटोत मी, कौशल , युगंधर, माझी आई , भाऊ आणि वहिनी होते.
कोणीतरी म्हणाले
"अरेच्या यात पुणे आबा (माझे बाबा) नाहीयेत वाटत. "
क्षणार्धात युगंधर म्हणला
" फोटोत दिसत नाहीयेत पण पुणे आबा माझ्या पोटात असणार."
आम्हाला सर्वांना हसून हसून वेड लागायचे फक्त बाकी राहिले होते.
माझे बालपण 'दापोली' या सुंदर गावात गेले. कौलारू घर, आजूबाजू पेरू, चिंच , आंबा , डाळींब , चिकू, केली याची भरगच्च झाडे. विहीर आणि त्याच्या भोवतीच्या गमती. पाठचे शेत. एकीकडे मलये आजी आजी तर दुसरीकडे बर्वे आजी अशी प्रेमळ उब. अशा सगळ्या आठवणी कधी गोष्टी म्हणून तर कधी गम्मत म्हणून युगंधरला मी नेहेमी सांगत असते. तो हि आईचे 'बालपण' कसे असेल याचे चित्र रंगवून पुन्हा पुन्हा सांग असे सांगत राहतो.
मग कधी माकडाची टोळी यायची आणि मग मी आणि पियुष (माझा भाऊ ) कसे डबे वाजवत त्यांना पळवून लावायचो हे सांगताना प्रश्न आला.
"मग मी कुठे होतो तेव्हा?"
"अरे माझ्या लहापणी तू नव्हतास ना मीच लहान होते तर."
"अग म्हणजे दापोलीत नसेन पण कुठेतरी असेनच की" ( तू नव्हतास हे उत्तर अजिबात आवडले नव्हते.)
"अरे मग तुला पण घेतो आमच्या team मध्ये. तू, मी आणि पियुषमामा तिघे जण डबे वाजवायचो." काय कळी खुलली होती विचारात सोय नाही. पियुषला पण बजावून ठेवले होते थोडे दिवस लहानपणचे काहीही निघाले कि त्यात युगंधरला घेऊन सांगायचे.
मग २ वर्षांपूर्वी दापोलीला जायचा प्रसंग आला. युगंधरला घेऊन पहिल्यांदाच जाणार होतो. फोनवर 'हॉटेल बुकिंग झालेय' असे काहीसे बोलताना त्याने ऐकले.
फोन संपल्यावर म्हणाला,
"अग तुम्ही दापोलीला हॉटेलमध्ये राहायचात का?"
" नाही रे का ?"
" मग आपण उद्या तुझ्या मलये आजीच्या शेजारच्या त्या घरी राहायला जाणार आहोत ना ते घर नाही हॉटेल आहे का? तुझे मलये आजी, बर्वे आजी, पेरूच्या झाडावरची माकडे सगळे भेटतील ना मला. "
मला २ मिनिट खूप गलबलूनच आल. त्याने आता आपण दापोलीला गेल्यावर आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या, ते सगळे लोक त्याला भेटतील अशी काय काय स्वप्ने रंगवली होती.
काळाच्या ओघात खूप सारे बदलतच जाते. माणसे , नाती, घर , परिसर सगळंच. त्यांना तस बदलणं प्राप्तच असत. पण आपल्या मनातलं नेमकं काय जपायला हवे ते आपणच ठरवायला हवे ना. दापोली भेटीत घराकडे चक्कर मारलीच नाही. युगंधरच्या भावविश्वातले आणि माझ्या आठवणीतले मला काहीच तसूभर सुद्धा हलू द्यायचं नव्हतं... आणि आताही आमची कृष्णाची प्रत्येक गोष्ट 'बोकोबाला' घेऊन असणार आहे बर का...

Friday, 18 May 2018

बियांचे ओटीभरण

' एका हाताने नांगरताना 'ती' धान्य ओटीतून धरणीच्या पोटात पेरत जाते
आणि तेच  'धान्य ' शतपटीने वृद्धिंगत होत 'तिच्या'कडे परत येते. 
या देवघेवीचे प्रतीक म्ह्णून प्रत्येक स्त्रीची  ओटी भरण्याची पद्दत रूढ झाली असावी . जेणेकरून तितक्या मोठ्या प्रमाणात धान्य तिच्या ओटीत घालून तिचा सन्मान करावा आणि तिने ते 'सृजन समृद्धीसाठी'जमिनीकडे वाहते करावे.'

या उन्हाळ्याच्या सुट्टीत
थोडीशी या सन्मानाची जाणीव म्ह्णून ,
तप्त काहिलीसाठी हतबल चर्चा सोडून करावयाचा एक ठोस उपाय म्हणून
आपल्या चिमुरड्यांसाठी 'सृजन' संस्कारचा भाग म्हणून
'एक बी म्हणजे एक जीवन' या तत्वाशी सांगड घालत ..
आपल्या काळ्या आईची ओटी बियांनी भरुयात का ?

ऊन वाढतंय तसे watsapp आणि सर्वत्रच फळे,  भाज्या यांच्या बिया साठवून पावसात त्या रस्त्याच्या कडेला / दरीत टाकून देण्याविषयीच्या posts येत आहेत.
तोच  धागा पुढे  घेत आपण हे काम  'मिळून साऱ्याजणी ' करूयात का ?
म्हणजे आपण सर्वजणी उन्हाळाभर या वेगळ्या बिया वर्गीकरण करत साठवू. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा शाळा सुरु होईल आणि पावसाच्या पहिल्या सरी सुरु होतील तेव्हा या बिया एकत्र जमवू. मग ज्या प्रकारच्या बिया जमल्या असतील त्याप्रमाणे पोहोचवू. म्हणजे भोपळा, कलिंगड  इ. बिया कोणाच्या शेतात पोहोचवू . जांभूळ, पपई थोडे कुठल्याश्या डोंगेरावर /रिकाम्या जागी लावू. खरेतर हे सर्व करण्यासाठी आपण साऱ्या मैत्रिणींची मिळून 'वर्षा सहलच' काढूयात की! जमलेल्या बियांचे शेवटी कसे नियोजन करायचे यासाठी ज्यांना यातली माहिती आहे त्यांनी कृपया माहिती सांगावी. 
या सर्व कामाला सर्वांच्या एकत्र प्रयत्नांची जोग मिळाली तर पर्यावरणाच्या (खरेतर आपल्याच मदतीचा) एक सुंदर प्रकल्प आपण करू शकतो.
कारण रस्त्यावर/ दरीत  टाकलेल्या  बीया काही वेळा सुकून जातात , काही वेळा रुजतात आणि एकदा त्या आपण टाकून दिल्या कि परत जाऊन पाहणे किव्हा त्याची काळजी घेणे हे आपल्या कडून घडत नाही. त्यामुळे त्या बिया कोणातरी काळजी घेणाऱ्या , यथायोग्य जोपासना करणाऱ्याच्या हातात पोहोचवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मला वाटते.

तर मग काय म्हणताय 'मिळून साऱ्याजणी' करूयात ना आपल्या 'मायमातीचे ओटीभरण'?

इSSSथे.....


युगंधरची शाळा 'ज्ञानप्रबोधिनी'चे वैशिष्टय आहे. मुलाच्या शाळेच्या भावविश्वात ते पालकांना इतके सहज सामावून घेतात की मग पालकांना ती आपलीच शाळा वाटू लागते. त्यांच्या शाळेतल्या छोट्या छोट्या उपक्रमात ते म्हणायला 'पालकांची मदत' असा उल्लेख करतात पण असा प्रत्येकच अनुभव एकुणातच 'व्यक्ती' म्हणून तुम्हाला समृद्ध करणारा असतो. लहान मुलांच्या निरागस जगात जिथे ती मनमोकळी होतात, नव्याने काही शिकत असतात, एकमेकांशी असलेले निरागस मैत्र जुळवत असतात, एकत्र गंमत गाणी म्हणत रमलेली असतात त्यामध्ये डोकावणे हा रोजच्या routinue मधला 'अमृतानुभव' असतो. तुम्हाला नकळत असे काही सापडून जाते की रोजच्या निरस चाललेल्या प्रवाहातून तुम्ही भानावर येता. आणि म्हणूनच शाळा आम्हाला कधी 'हाक' मारते याची आम्ही सर्वच पालक वाट बघत असतो. त्यातलाच हा एक गंमत अनुभव!
परवा खेळगटाची म्हणजे शाळेची सर्वात छोटीशी 'शेंडेफळे' यांच्या सहलीसोबत जाण्याचा योग आला. ठिकाण होते चिंचवडमधले 'मोरया गोसावी मंदिर' आणि त्याच्या शेजारची प्राण्यांची शिल्पे असलेली बाग! तर तिथे आम्ही पोहोचलो. देवाचे दर्शन घेऊन एके ठिकाणी वृषालीताई सर्व मुलांना घेऊन बसल्या आणि गप्पा गोष्टी सुरु झाल्या.
"चला सांगा आपण कुठल्या मंदिरात आलो आहोत?"
"मोरया गोसावीsssss !" सगळी मुले एकसाथ म्हणाली.
"मंदिर कुठे आहे?"
काही जण 'चिंचवड' असे म्हणाली पण खूप सारी मुले म्हणाली,
"इSSSथे....."
आम्हाला सर्वांना त्यांच्या या 'निरागस' उत्तराची खूपच गंमत वाटली. मग ताईंनी त्यांना आपण चिंचवडला आलो आहोत आणि इतर माहिती सांगितली
हीच गोष्ट आज गंमत म्हणून युगंधरला सांगत होते. बालवर्गात गेल्यापासून आणि आपण शाळेतला 'दादा' वर्ग आहोत हे कळल्यापासून अश्या 'छोट्याश्या' मुलांच्या गंमती ऐकण्यात स्वारीला भारी interest असतो.
"अरे माहितिये का काल खेळगटाच्या सहलीला काय गंमत झाली?"
"गंमत म्हणजे joke झाला का काही?"
"हो jokeच झाला रे.. "
मग मी सगळे सांगताना त्यालाच प्रश्न विचारला
"आणि मग ताईनी विचारले 'मंदिर कुठे आहे' तर काय म्हणाली माहितीये का छोटीशी मुले?" (असल्या गमती सांगताना सारखी ती 'छोटीशी' आहेत असे म्हणावे लागते.)🙃
" 'इथे' असे म्हणाली असतील की"
"अरे तुला माहितीये ना 'मोरया गोसावी मंदिर' कुठे आहे?"
"हो माहितीये की 'चिंचवड' मध्ये आहे. पण ती तिथेच असताना असे कशाला म्हणतील ते ? ते तर 'इथे' असंच म्हणतील ना?"
"हो खरचं की रे!" असे मी म्हटले आणि माझा चेहरा काहीतरी ठाव घेते आहे पण उमगत नाहीये असा गमतीशीर झाला असावा कारण 'एवढं कसं बर नाही कळत हिला' असा मिश्किल चेहरा करत तो खेळायलाही गेला.
मी मात्र खरच विचार करत राहिले, जिथे असेल तिथे प्रत्येक ठिकाणी 'इथेच' असणे कधी बरं निसटले असेल आपल्याकडून!
आजचा दिवस मावळताना उद्याच्या चिंता आणि दिवस सुरू होताना कालचे ओझे घेऊन का बरे फिरतो आहोत आपण?
खूपच क्वचित वेळी आपण मनाने त्या त्या ठिकाणी उपस्थित असतो.
आणि आजकाल तर प्रत्येक क्षण आपण मोबाईल कॅमेराच्या नजरेनेच बघतो की काय असे वाटावे असे Selife चे वेड आहे आजूबाजू! आणि आहे हा क्षण आहे तसा 'जगून' त्याची मजा चाखण्यापेक्षा तो क्षण watsapp वर , FB वर टाकून बाकी सर्वांना त्या क्षणात खेचण्याची केविलवाणी धडपड करतो का आपण? खूप सारी क्षणचित्रे नुसती साठवतच राहिलो आहोत का आपण आणि खरे जगणे जरा बाजूलाच राहते आहे की काय?
म्हणूनच भानावर आणणारा 'छोट्याश्या' गोड मुलांचा आवाज जरा मी जपूनच ठेवलाय मनात!
उद्याच्या किव्हा कालच्या कुठल्याही गोष्टींचा बागुलबुवा माझ्या 'आज' आणि 'आत्ता' वर संक्रमण करू लागला तर हलवेन स्वतःला आणि हळूच सांगेन ,'अगं, इsssथे'!😊

एका वेणीची गोष्ट


सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी college मधली कॅनडाला स्थाईक झालेली मैत्रीण प्रिया हिच्या फेसबुक भिंतीवर तिची मुलगी Melanie हिची cancer patients साठी hair donate केल्याची तिच्या फोटोसकटची post झळकली. अवघ्या १२ -१३ वर्षाच्या या गोड चिमुरडीचे हे पाऊल मला खूप भावुक करून गेले. तिने चक्क डोक्याचे पूर्ण मुंडण करून donate केले होते. उमलत्या वयातल्या मुली एकूणच आपल्या दिसण्याविषयी कित्ती जागरूक असतात आणि म्हणूनच तिचे हे धाडस मला खूप कौतुकाचे वाटले.
नुकत्याच कर्करोगाने गमावलेली माझी जवळची शोभाआत्या आणि सुंदर मैत्र जुळत असतानाच निघून गेलेली माझी नणंद मानसी यांचे दुःख मनात ताजे होते. शारीरिक किव्हा भावनिक यातना असले काहीच तुम्ही share करू शकत नाही याचे हताश ओझे मनात होते. दोघीनीही आजाराचा, आपल्या दुखण्याचा बाऊ न करता सारे हसत निभावले , आपले दुःख कोणाला कळू न दिले नाही की नियतीनेही क्षणभर नतमस्तक व्हावे. शेवटपर्यंत सर्वांना आनंदच दिला आणि सारे स्वतः सोसत राहिल्या. पण दोघींच्याही आजारात केमोमुळे गमावलेले केस ही एकच गोष्ट होती की ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे दुखावलेपण मी पाहिले होते. केस ही कोणाच्याही दिसण्याचा आणि प्रतिमेचा अविभाज्य भाग असतो. म्हणूनच ठरवले एका तरी व्यक्तीच्या हसण्यामध्ये माझ्या केसांचा वाटा असेल असे काही शक्य आहे का आपल्याला? अगदी सरसकट सगळे केस नाही जमणार पण जेवढे शक्य तेवढे केस वाढवून करूया की donate. आणि या एका सदीच्छेने मी केस वाढवू लागले.
संकल्पाला पाठबळ मिळावे आणि डगमगू नये म्हणून घरात संकल्प सांगितला. तर सर्वच बाबतीत आधार असलेल्या माझ्या सासूबाईनीही माझ्या सोबत 'एक वेणी' दान करायचा संकल्प सोडला आणि संकल्पाला दुप्पट जोम आला. पण गम्मत म्हणजे लहानपणापासून माझे केस ही माझी 'खाजगी मालमत्ता' नव्हतीच मुळी. त्यामध्ये माझ्या मैत्रिणी, बहिणी , नातेवाईक यासर्वांचीच प्रेमाची गुंतवणूक आणि जपणूक आहे. त्यामुळे त्यासर्व लोकांच्या उल्लेखाशिवाय हे दान पूर्ण होऊ शकत नाही. त्याचीच ही 'एका वेणीची गोष्ट'!
माझी सांगलीची आज्जी म्हणजे आईची आई मूळची गोव्याची होती आणि शेवटपर्यंत गोवा मनात जपून होती. गोव्याचे घरच्या माडांच्या नारळाचे शुद्ध खोबरेल तेल आणि त्या तेलाच्या वापरामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते अशी तिची श्रद्धा होती. तीचे केसही शेवटपर्यंत कंबरेएवढे लांब होते. तीच वंश परंपरा actually केश-परंपरा माझी आई आणि माझ्यापर्यंत आली आहे याबद्दल तिला खूप आत्मीयता होती. माझ्या आईचे केस अजूनही गुढघ्याएवढे लांबीचे आहेत. आईचे केस सरळ असल्यामुळे तिला ते छान सांभाळता येतात. पण माझे केस थोडे कुरळे ,थोडे सरळ आणि मुळात दाट असल्याने आणि त्यात लहानपणी दापोलीसारख्या लाल मातीच्या गावात राहत असल्याने १-२ वेणीचे पेड यापलीकडे ते वाढवण्याची हौस काही करता यायची नाही. दर सुट्टीत मामाच्या घरी गेल्या गेल्या आजीचे लक्ष्य माझ्या केसांकडे असायचे आणि तेवढेच किव्हा जरा कमीच झालेले केस बघून 'तुम्ही आजकालची मुले तुम्हाला तेल लावायला नको. असंच अन तसच..' गाडी केसांवरून घसरून कुठे कुठे पोहोचायची. पण आहे तेवढया केसांचे सुट्टीभर तेलमाखन लाड व्हायचे. रोज दूपारच्या झोपेनंतर घरा बाहेरच्या ओट्यावर बसून तेल चोपाचोपी आणि घट्ट वेणी असा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट घातलेल्या असायच्या की त्या नंतर खेळणे , दंगामस्ती , रात्री झोप या सर्व प्रकारा नंतरही त्या तसूभरही खरेतर केसभरही हललेल्या नसायच्या . असले अजब कसब फक्त माझ्या आजीच्या प्रेमळ हातातच होते .
शाळा संपली आणि ११-१२ आत्याकडे पुण्याला राहायला आले. अभ्यासाच्या ओझ्यामध्ये आता अजून केसांचे ओझे नको असे सर्वानुमते ठरले मग रडत रडत short bobcut करून टाकला. आणि मग जरा वर्षभर आजीची भेट एकदा दोनदाच झाली आणि थोड्याश्या ओरड्यावरच थोडक्यात निभावले. नव्या style ला नव्या मैत्रिणींकडून compliments मिळाल्यावर जरा जीव भांड्यात पडला.पण तिथल्या माझ्या मत्रिणी अँन आणि प्रफुल्लता यांचे छान कंबरेएवढे लांब केस होते. त्यांच्या नादाने परत केस वाढवायला लागले.
मग engineering च्या पहिल्या वर्षाच्या शेवट पर्यंत परत एक दोन वेणीचे पेड पर्यंत मजल गेली. आणि मग एके दिवशी building मधल्या एका मैत्रिणी सोबत parlour मध्ये तिचे केस कापायला गेलो आणि मलाच blunt cut कसा छान दिसेल असे अशा स्तुतीला भुलून परत एकदा केसांची मस्त वाट लावून घेतली. पण यावेळी मात्र collegeच्या मित्रमैत्रिणींनी लांब केसच कसे छान दिसत होते हे अजिब्बात छान नाही दिसत आहे असे म्हणून आगीत (की डोक्यावर) तेल ओतले. मग मात्र कसलीही तमा न बाळगता केस महाशय भराभरा वाढू लागले. चक्क कंबरेपर्यंत पोहोचले. प्रत्येक सुट्टीत आजीला भेटून केस दाखवायची गंमत वाटू लागली. खालून just trim करतानाही जरा जास्तच कापले जाऊ नयेत म्हणून आईला घेऊन जायचे parlour मध्ये.
पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आईने खूप बजावूनही मी शिकले नाही ती म्हणजे स्वतःची वेणी स्वतः घालणे. काही केल्या मला स्वतःला मी घातलेली वेणी मुळी आवडायचीच नाही. त्यामुळे आईच वेणी घालायची किव्हा रोज हट्टाने मी तिच्याकडूनच वेणी घालून घ्यायचे.
मग job सुरू झाल्यावर पाहिले ४ महिने म्हैसूरमध्ये training होते. तिथेही माझ्या गोड मैत्रिणी अपर्णा आणि प्रगती यांनी माझ्या केसांचे खूप लाड केले.
रोजच्या अभ्यास आणि घाई गडबडीतही त्या न कंटाळता माझी वेणी घालून द्यायच्या. मग परत पुणे आणि मग आईच्या हाताची वेणी.
४-५ वर्ष ही केशसेवा मी हक्काने करून घेतली. म्हणजे मी स्वतः वेणी किव्हा काही इतर केसांचे करायचे खूप उद्योग करायचे पण काहीच पसंत न पडून आईच्या पुढ्यात रोज केस आणि कंगवा घेऊन यायचे मग आईकडून वेणी घालून घ्यायची. कधी सणानिमित्त जमलो कि माझ्या मामेबहिणी सुखदा आणि मुग्धा यांच्यासाठी नवनव्या hairstyles try करण्यासाठी मी हक्काची मॉडेल होते. मग शाळेतल्या मैत्रिणींच्या लग्नात प्रत्येक वेळी वाढणाऱ्या केसात माझ्या मैत्रिणींचाही जीव अडकू लागला. अश्या प्रकारे माझे केस म्हणजे सर्वांनी प्रेमाने सांभाळायची लाडकी पब्लिक प्रॉपर्टी झाले. मग प्रेमात पडल्यावर कौशलनेही लांब केस आवडत असल्याचा दुजोरा दिला. मग काय केसांना वाढत राहण्याचा प्रेमळ धाकच मिळाला की.
मग लग्नातही मोठ्ठे केस आणि त्याच्या hairstyles छान मिरवल्या मी. लग्न झाल्यावर मात्र नव्याने पडलेली घराची जबाबदारी आणि office मधले मानमोडू japanese project... ही तारेवरची कसरत करताना एरवी जणू शरीराचा एक अविभाज्य भाग किव्हा अवयवच झालेले केस सांभाळणे जरा डोइजडच व्हायला लागले. त्यात हिंजेवडीचे traffice, धूर! मग परत एकदा मनावर दगड ठेवून केस अर्धे केले. थोडी वर्षे जरा styles केल्या पण मग गोड बाळकोबांचे घरात आगमन झाले. Office, घर आणि माझे गोंडस बाळ!! परत केसांनी backseat घेतली. Stepcut आणि तत्सम नव्या outfit मध्ये मानेपर्यंत आपले हातपाय आवारत केस महाशय हू की चू न करता माझे busy bee routine सोपे करू लागले.
मग युगंधर अडीच वर्षांचा झाला आणि कौशलच्या project निमित्त london ला राहायचा योग आला. आणि तिकडच्या parlour मध्ये कोण बाई जाणार असे करत एक सात आठ महिने केस परत एक-पेड दोन -पेड वाढले. केस थोडेसे वाढले की वेणी घालून बघायची अशी का कोण जाणे हौस आहे मला. तशीच कधीतरी घातली असावी. एकदा खेळताना युगंधर येऊन म्हणाला 'त्यादिवशी ते केसांचे कसे केले ना तसे कर ना!' म्हणजे कसे? असे का? का तसे विचारत असता एक नवीनच गंमत कळली. 'अग ते नाही का असे मानेवर येते.... ते ओढायला मज्जा येते ते...'
केसांचा असाही उपयोग असतो हे फारच गमतीचे होते. मग युगंधरसाठी केस वाढवायचे असे ठरवले. मी infy मध्ये काम करत असताना माझी एक खूपच गोड PM होती माधुरी देवधर. 'आपल्या मुलाला साडीतली आई कशी असते ते कळावे म्हणून आठवडयातला एक दिवस छान साडी नेसून यायची. लगेच copy cat म्हणून मीपण तसेच करायचे ठरवले होते. पण मनातल्या मनात सुद्धा मी तो संकल्प पाळू शकले नव्हते त्याची खंत मनात होती. पण म्हटलं साडीतली आई जाऊदे आपण वेणीतली आई जरा try करूयात. आणि परत जोमाने मी केस वाढवायला लागले.
मग दोन वर्षांपूर्वी मला फेसबुकवर Melanie ची गोष्ट कळली आणि मी संकल्पाने केस वाढवू लागले.
आपले केस आता ही कोणा दुसऱ्याची आपल्याकडे असलेली ठेव आहे आणि तिची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना असल्याने रोजच्या धावपाळीतही केसांची निगा राखण्याचे ओझे वाटेनासे झाले. गेल्या गणपतीपर्यंत छान कंबरेच्यावर पर्यंत वाढले. मग ठरवले की अजून एप्रिल मे पर्यंत जेवढे वाढतात तेवढे वाढवू आणि मग थांबू. पण मग नोव्हेंबर मध्ये अचानक कावीळ झाली आणि त्यामध्ये आलेल्या अशक्तपणात केस भराभर गळायला लागले. मला बाकी कशाहीपेक्षा संकल्प पूर्ण होणार नाही याचेच वाईट वाटू लागले. पण मग आमच्या फॅमिली डॉक्टर सरोज सोनारे यांनी 'भृगराज घन वटी' च्या गोळ्या घ्यायला सांगितल्या आणि खरच १५ दिवसात केसगळती आटोक्यात आली. मग जरासे बरे वाटले.
सरतेशेवटी शेवटचा पल्ला म्हणजे केस कापणे आणि विग बनवण्यासाठी देणे. ही फारच कॉमन गोष्ट आहे असे मला वाटले होते त्यामुळे आधी मी कधीच याची चौकशी केली नव्हती मग शोधता शोधता असे कळले कि पुण्यात अशी काहीच सोय नाही .
मग नेट वरून ही लिंक
https://www.copewithcancer.org/hair-donation) मिळाली आणि मग त्यांना केस पाठवले आणि आज त्यांची पोचपावती आली आणि खरच जीव भांड्यात पडला.
केसांचा प्रथम बो बांधून मग त्याची वेणी घालायची. खालून वरून रबर असलेली वेणी मग नीट राहते. पण बो जिथे बांधतो तिथे वरून केस कापावे लागतात त्यामुळे ते वेडेवाकडे कापावे लागतात. माझी building मधली मैत्रीण श्रेजल हिने आपले सर्व कसब पणाला लावून वेड्यावाकड्या केसांचा सुंदर haircut करून दिला म्हणून तिचेही आभार.
आपण जरी सद्भावनेने एखादी गोष्ट करत असलो तरी त्याच्या परिपूर्ततेसाठी खूप साऱ्या गोष्टी पार कराव्या लागतात आणि आज त्या संकल्पांची पूर्तता झाली म्हणून हा लेख प्रपंच. लहापणापासून 'नेकी कर और दर्या मी डाल' असे आईने मनावर बिंबवले आहे. एखादे चांगले काम करशील आणि त्याचा मनात जरी उच्चार करशील तर त्याचे श्रेय गमावून बसशील म्हणजे केलेल्या क्षणी ते विसरून जायचे असाच सुंदर संस्कार तिने नेहेमीच केलेला आहे पण आजची ही वेणीची गोष्ट जरा आईचा नियम मोडून एवढ्याचसाठी सांगते की Melanie च्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मी हा संकल्प केला तशी प्रेरणा हा लेख वाचून कोणाला तरी मिळावी.
कोणाचे तरी हसू असेच कोणाच्या तरी सदिच्छेने फुलत राहावे. आपण कोणीच पूर्ण नाही असेच रोजच्या जगण्याला नव्याने आखत कोणाकोणाच्या आनंदात आपला खारीचा वाटा असावा आणि त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करूयात.
माझा इवलासा बाळ जरा या धक्क्याने नाराज झाला होता कारण त्याला काही केल्या मी नेमके काय करणार आहे ते imagine होत नव्हते म्हणून केस कापायला मुद्दामून घेऊन गेले आणि मग आप ल्या आईला हा नवा haircut बरा दिसतोय आणि मुख्य म्हणजे ती खूप आनंदी आहे याने त्याची नाराजी दूर पळाली आहे...
आज दूरवर बाप्पाकडे राहायला गेलेली माझी आजी आजच्या माझ्या या केस कापण्याला नक्की आनंदाने आशीर्वाद देईल... आणि माझी आई , माझ्या केसात आपापला जीव अडकवलेल्या , माझ्या बहिणी, माझ्या शाळेतल्या मैत्रिणी , आत्ताच्या युगंधरच्या मित्रमैत्रिणींच्या आई असलेल्या मैत्रिणी यांनाही हा धक्का नक्की समाधान देईल अशी आशा करते....माझ्या या संकल्पात माझ्या सासूबाई सौ. वैजयंती रुकडीकर- देशपांडे यांचा भावनिक आणि कृतिशील वाटा आहे म्हणूनच हे दान आम्हा दोघींच्या वतीने ईश्वरचरणी अर्पण करतो आहोत आणि कोणाच्यातरी सुंदर हास्याची मनःपूर्वक कामना करतो आहोत....
शुभम भवतु... शुभम भवतु... शुभम भवतु !!!!