- ग्लानीतून तिला जाग आली तेव्हा उन्हं उतरंडीला लागली होती... आताशी आपल्या सवंगड्यांसवे, गाईगुरांना घेऊन येईल तो.'आज काय खाऊ केला आहेस लवकर दे बघू.. ' म्हणून भवती पिंगा घालेल आणि काय करू अन काय नको असे होऊन जाईल आपल्याला...अशी काय जादू आहे त्याच्या डोळ्यात अवघे जग विसरून रमून जातो आपण.खरेतर दटावयाचे असते त्याला उशीर केल्याबद्दल,दुपारी यमुनेला गेल्यावर सर्वांसमोर वाट अडवल्याबद्दल, कोणाकोणाच्या घरी जाऊन लोण्यावर ताव मारल्याच्या उगा कथा केल्या बद्दल!पण आपल्या शब्दात असे गारुड भरतो की ऐकतच राहावेसे वाटते. स्थळ , काळ , वेळाभान सगळंच कसं विसरून जातो आपण तो आला की!आणि तो सोबत नसताना सर्वांसोबत अन मनातही त्याच्याच गोष्टी करत राहतो.एकदा चुकून निघून गेलं बोलताना 'खूप मोठ्या माणसांसारख्या गोष्टी करतो' आणि या कानाचे त्या कानी होताना 'तो तिला हवे तेव्हा मोठे होतो' च्या व्यर्थ वल्गना झाल्या.किती रडलो आपण त्या दिवशी! दिवसभर वाट पहिली धास्तावून ....आला तर काय होईल आणि नाही आला तर अजूनच काही होईल..आणि आला तो नेहेमीसारखा हसत नाचत... आपल्या इवल्या हातात हनुवटी धरून म्हणाला"बरं झालं की लोक असं बोलताहेत. होऊनच टाकतो की मोठा आणि मग करून टाकू लग्न बिग्न"तिला एकदम हसूच आले."लग्न बिग्न ? ते काय असते ते माहिती तरी आहे का वेड्या मुलाला?चल खाऊ केलाय तुझ्या आवडीचा.मित्रांनाही बोलाव. खूप सारा केलाय. सर्वजण मिळून खा.""कधीतरी तुझ्याही आवडीचा खाऊ करत जा की. तोसुद्धा तितक्याच आवडीने खाईन. किव्हा मीच करत जाईन. यालाच म्हणतात लग्न....."खट्याळ हसू मिरवत स्वारी निघूनही गेली आणि आपण वेड्यासारखे विचार करत राहिलो ....पण ही ग्लानी कसली ?आता नेमका कसा दिसतो ...कसा हसतो.. काहीच कसं आठवत नाही..भ्रम .. संभ्रम कसलं दाट धुकं?डोळे उघडत तिने सभोवार पाहिले.आजूबाजूचा कण न कण निष्प्राण होऊन पडला होता...माणसं, झाडं, वेली, रस्ता ,गायीगुरं , सांजवारा स्तब्ध ...जीवघेणी शांतता ...वेळभानेची काळोखी पोकळी.... बाहेर पडण्याची वाट नसलेली...त्राण गळालेली ...असहनिय....असहाय्य..काही दिवसांपूर्वीची ती आर्त पहाट तिला आठवली..."का ग सानिका, तुझा स्वर आज असा व्याकुळ का?" तिच्या काळजात कळ उमटली."माझं जाणं अटळ आहे... तुला कसं सांगू...""कुठे जाऊ शकशील मला सोडून?""दृष्टीभ्रमापलीकडे ...""कित्ती गहन बोलतोस? आणि का बोलतो आहेस असं? हे असंच सारं व्हायचं होतं तर हे माझ्या अवघ्या अस्तित्वाच्या कुडीत न मावणारं वेड तू का लावलंस? ""तु उत्तर जाणतेस ... "त्याच्या डोळ्यातली निरव शांतता तिच्या हृदयाला पार चिरून गेली.आत्ताही तिला हे सारं आठवलं आणि वर्तमानाचा संभ्रम पडला.काही वेळापूर्वी असं रथाचे चाक अडवून उभे होतो आपण...एरवी आपल्या चेहेऱ्यावरच्या दुःखाच्या , अस्वस्थतेच्या एका पुसट रेषेनेही विस्कटणारा तो आज किती निश्चल, निश्चयी, ठामपणे रथ हाकायला सांगत होता.कोणीतरी त्याचे रूप घेतलेला बहुरूपी म्हणावा तर त्याच्या सुरेल अंतःकरणाचे सोंग कुणा पेलू शकेल...त्याचे सुंदर हृदय डोकावणारे लोभस डोळे कोण लेऊ शकेल?तोच होता... आणि त्यानं सांगितले होतं ...हे अटळ आहे ... त्याची आपली भेट जितकी अटळ ...तितकाच भेटीनंतर वियोगही .... आणि जीवघेणा विरहही..तात्पुरता ..की कायमचा ?कोण सोडवील हे कोडे...त्याच्याशिवाय कोण सोडवू शकेल..?पण तो...पोहोचण्याच्या सर्व शक्यतांच्या पार गेलेला..अजून काय बरं म्हणाला होता तो.?.. तिने कशोशीने आठवायचा प्रयत्न केला.पीळ पडलेल्या हृदयातून ,त्याच्या आठवणींच्या घनदाट जंगलातून..मनभर विखुरलेल्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जोखत जाताना तो आता असणार नाही या भयाण जाणिवेला कसं सामोरे जायचं?आणि तिला आठवले..त्याचे आश्वासक डोळे .... तिच्या मनाचा ठाव जाणणारे... हृदयीचे गुज ऐकणारे..."माझ्या सानिकाचा इतका का दु:श्वास करतेस?""ते तुला नाही कळणार...दु:श्वास नाही ... खूप हेवा वाटतो.. आपल्याला इतके निर्व्याज राहता येत नाही याचे ... इतके समर्पण कधी तरी शक्य होईल का आपल्याला याचे उत्तर 'नाही' मिळते त्याचे दुःख असते ते ... ""तुम्हाला दोघींना मिळून खरंतर 'मी' खेळावा लागणार आहे पुढे.. ""म्हणजे रे ?"त्याने नेहेमीप्रमाणे पाव्यावर ओठ धरले आणि काही काळापुर्वीचे गूढ बोलणे आपण विसरून गेलो...काय होता त्याचा अर्थ .?...मनाशी विचार करताना तिला अचानक अवसान आले आणि ती धावत यमुनाकिनारी गेली ..तिथे त्याच्या सुकुमार पाऊलखुणा रेतीत तश्याच उमटून राहिल्या होत्या ...तो नेहेमी बसायचा तो दगड आणि त्याची प्रिय 'सानिका'..तिला खूप भडभडून आलं ....सांजवेळा मावळतीला लागतानाचा कातर स्पर्श तिला सहन होईना ..आंतरिक उमाळ्याचे कढ रिचवततिने बासरी हातात घेतली ...बासरीवर रेंगाळलेला त्याचा अमीट स्पर्श तिला कणभर उभारी देऊन गेला...तिने बासरी प्राणपणाने ओठाला लावली पण त्यातून सूरच उमटेनात ....तो तर सोबत आपले श्वासही घेऊन गेला....क्षितिजावर एक एक करत चांदणी उमटू लागली आणि काळोखात काही सावल्या भास वाटाव्या इतक्या ओळखीच्या ... तिला काही सांगू पाहणाऱ्या ... सुचवू पाहणाऱ्या ..आणि अजमावू पाहणाऱ्या..आणि दृष्टीभ्रमापलीकडे उभा होता तो ... तितकाच मिश्कील हसत ... आपले खट्याळ डोळे रोखून ...तिला हर्षोल्हासाचे भरते आले... आणि अधराच्या पाकळ्यांमधून मुक्त झालेला तिचा श्वास सानिकेसोबत संगीत खेळू लागला ...प्रेमविलापाचे आर्त स्वर ..वाऱ्यासोबत इतस्थत: पसरू लागले .. आणि तिच्या दुःखावेगाचे निरूपण होऊ लागले..दूर गेला तरी कुठे कुठे आणि किती किती भरून राहिला होता तो...आजूबाजू सर्वत्र आणि आपल्या आतही तोच .. ..इतके तादात्म्य इतकी एकरूपता तो असताना कधीच कशी जाणवली नाही?की समझावत होता तो हेच सारं आपल्या अगम्य भाषेतून आणि आपण मात्र आपल्या मायेच्या धुक्यातून .. निरर्थक बंधने माळून... बाहेरच पडू पाहत नव्हतो..आता मात्र सानिका मुक्तपणे आनंद बरसवत होती ... ती स्वतःच त्यात इतकी रंगली होती की जणू खऱ्याखोट्या कुठल्याच उत्सर्गाची गरजच मिटावी ...यमुनेच्या पाण्यात मंत्रमुग्ध लाटा अविरत खेळू लागल्या .. उमटणारे उत्कट जलतरंग...आजूबाजू वृक्ष , वेली , आणि अंधार लयबद्ध ...अवघा आनंद, काळ स्थानबद्ध ..उत्तररात्रीला पारिजात शुभ्र आनंद ढाळु लागला आणि ती भानावर आली ... ही इतकी सगळी जादू आपल्याला त्यानं कधी बरं शिकवली ?ती वेगात निघाली बेभान , सैरवैर .... आता थांबून चालणार नव्हतंच..वाटेतल्या प्रत्येक कणाकणाला , अणूरेणूला 'संजीवन भान' देत ... मृत , अवकळा आलेल्या प्रत्येकाला नवजीवन देत ..आणि पहाटेच्या पहिल्या प्रहरी 'त्याच्या जाण्याचा.. त्या दुःखाचा' विसर पडावा इतकं सारं पूर्ववत ... तिचा विश्वास बसेना ..त्याच्या विरहाच्या दुःखात चूर होताना हे पुनर्निर्मितीचे दान आपल्या ओंजळीत टाकून...
Sunday, 23 August 2020
कृष्णमयी...
Wednesday, 22 July 2020
ती'ची मुक्तिकथा
पहाटेच्या दुलईत रात्र मिटू लागली होती..धुक्यात अवघे जग मंत्रून झोपी गेले होते....
तिच्या पहाटेच्या नित्याच्या कामांना मात्र वेग होता... कारण आज तिचा तो तिला भेटणार होता...जगाच्या नजरेंपलिकडे...
दळणकांडण उरकून , गाईगुरांच्या धारा काढून, त्यांना चारा सरकवून ती वेगाने निघाली...
बेभान ...अस्वस्थ..उत्सुक... थोडीशी धास्तावलेली...
आणि नदीकाठी तिला 'तो' तिची वाट पाहत असलेला दिसला.... तिच्या धाप लागलेल्या शरीराभर एक गोड शिरशिरी उमटली.....
पण नेहेमीच्या आवेगाने तो जवळ आला नाही...मग ती तिच्या प्रेमभरल्या असोशीने जवळ गेली..
"हे काय आज काही बोलायचे नाही वाटतं..." तिच्या काळ्याभोर डोळ्यात दुःख उमटलं..
"वेडे, तुझा माझा संवाद-संबंध हा किती जुना अग... ही आजची का गोष्ट आहे?"
"बोल ना काहीतरी.. खूप ऐकावेसे वाटतं आहे ...."
"बरं चल, आज वेगळया भाषेत बोलू....."
"पण मला तर प्रेमाची सोडून कुठलीच भाषा येत नाही की..."
तिच्या गोंधळलेल्या आविर्भावावर तो नेहेमीसारखा गोड हसला. गालावर एक टिचकी वाजवत म्हणाला,
"जा तिथे पलीकडे बस.मी इथं या दगडाशी बसतो."
"हे काय? एवढ्या लांब मुळीच नाही हं...का छळतोस?.."
"लांब? दिवसभर सोबत नसतेस तेव्हा लांब असतेस वाटतं..?"
तो एक मिश्किल हसू फेकत म्हणाला आणि ती लाजेने चूर झाली. जाऊन पल्याड जाऊन पाण्यात पाय सोडून बसली.
"हं.. बोल आता"
पण तो शांत बसला होता...ध्यानस्थ...स्थिरचित्त .. अविचलीत..आत्ममग्न...
एकाच प्रेमबंधनात राहून हा इतका कसा स्वस्थ, शांत कसा राहू शकतो..?.तिला परत एकदा नव्याने वाटून गेलं...
त्याने त्याच्या पाव्याला ओठ लावले होते.
तिला क्षणभर त्या 'सानिका' चा प्रचंड हेवा वाटला... वाटलं असेच एकादाच आपल्यातही प्राण फुंकून टाकून हा मुक्त का करत नाही आपल्याला...?
रोज एक अस्वस्थ, कासावीस तहान होऊन जगतो आपण...
पण त्याने सूर लावला होता आणि तो अलगद तिच्या मनाला भिडला तशी ती मंत्रमुग्ध झाली..
आणि सूर वाहत राहिले तिच्या अवतीभोवती ...तिच्या अंगाशी खेळत... तिला सुखतीशयाने फुटून जाणार असं वाटू लागले.
कळू लागली तिला ही शब्दांपलीकडची सूरभाषा...
"अजून पूर्णत्वाने नाही आलीस इथं तू..."
"....कशी येणार ..?वर्तमानाचं भान कसं सोडणार..?."
"मोकळा कर तुझा तो केशसंभार ज्यात तू कितीतरी बंधने माळून आली आहेस..."
"असे कसे करणार अरे..मी परत कशी जाणार मग?"
"मी जाऊच देणार नाहीये तुला परत..."
त्या लडिवाळ प्रेमाने ती तृप्त हसली...
बासरीचे सूर अलगद तिच्या एक एक बटा सोडवत केशसंभार पाठीवर पसरवू लागले. आणि प्रत्येक बटे सरशी ती मुक्त होऊ लागली...नदीकाठचा वारा तिच्या केसातून वाहून तिची गात्रे शांत करू लागला..
उगवतीला नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं... यमुनेच्या श्यामवेल्हाळ जलात तिचं अस्पष्ट प्रतिबिंब तिला हिंदकळताना दिसू लागलं....
"मी एवढी सुंदर दिसू शकते..?"
तिचा तिच्यावर विश्वास बसेना..
"तुझ्या माझ्याठायी रत असलेल्या आत्म्याची प्रचिती नाकारू नकोस वेडे... मला तू नेहेमीच अशी दिसतेस.."
"नेहेमी? कित्ती खोटं ....तुला मी एरवी आठवते तरी का?"
लटक्या रागाने ती म्हणाली,
"कुठूनही उगम नसताना अचानक वाऱ्याची झुळूक कुठून येते ...?
गंधभरल्या फुलांची ओंजळ हुंगुन जेव्हा हृदयाशी धरतेस तेव्हा तुझ्यासाठी ते स्वत्व इतक्या नितळपणे तुला कोणी पाठवलेलं असतं..?
रात्रीच्या निरव प्रहरी अलगद जाग येते तुला आणि आधाराला शोधतेस तो शाश्वत श्वास घेऊन कोण उतरतं तुझ्या मानत...?
मी सोबत नसतानाही तुझ्या इवल्या हृदयाची धडधड कोण शांतावतं.. ?
तुझ्या अवघ्या अस्तित्वाला कोण वाहतं ठेवतं?"
"तुझेच कुटील प्रश्न अन तुझीच लोभस उत्तरे ..."
बासरी आता समेला पोहोचली होती. मंतरलेल्या मुग्ध स्वरात आता ती विरघळून जाऊ लागली होती.
तिचे अणुरेणू तिच्याच नकळत विरळ होऊ लागले...
पायाशी असलेल्या यमुनेच्या पाण्यात मिसळून जलमय झाले...
नदीकाठच्या मऊ मृत्तिकेत तिचे काही कण अलगद मिसळून गेले...
भवताल वाऱ्यात उधळून जात 'ती' अवकाश झाली..
सगळ्या मर्यादा, बंधने , सुख , दुःख मागे सोडत आनंद विभोर झाली..
कुठे राहिली ती तिची, त्याची किव्हा कोणाचीच?
आणि या सर्वाचा कर्ता 'तो' मात्र सवयीने अंतर्धान पावला ...
इकडे गावात आवई उठली ...भल्यापाहटे 'ती' नाहीशी झाली...काठावर फक्त तिची वस्त्र आणि आभूषणे मिळाली....
आणि एक कथा...
काही 'ती' ना मात्र गूढ वाटत नसलेली..
त्यांचे केशसंभार सुटून मुक्त करू पाहणारी...
Subscribe to:
Comments (Atom)

