Monday 11 January 2021

Fullproof फूल

 

फुलातलं गम्य हुंगत
ती झाडाशी उभी होती...
 
अजून एक वेडं फुल
म्हणून झाडानेही तिला सहज
सामावून घेतलं ...
 
आणि अश्यात
हवेतल्या बाष्पाला
अलगद उतरण्याचा मोह पडावा
असं 'त्याचं' उत्तर आलं...
 
तिनं दवबिंदू म्हणून अलवारपणे झेलेलं...
 
आणि पानांनीही
उगी त्यावर हक्क मिरवला नाही...
 
असं 'तुझं माझं' करायचं नसतं
तरच मोकळं आकाश कुणाचंही होऊ शकतं...
 
झाडं कित्ती सहज काही शिकवून जातात...
 
पण मग 'फुलपाखरी' हृदयाची ती
इतस्ततः उधळली..
 
परत काहीसं आठवलं म्हणून परत त्याच झाडापाशी आली...
 
"हं, आता काय?"
 
"मगासच्या कवितेत थोडे corrections करायचे होते..."
 
झाडाला फुटकन हसूच आलं पण जरा रागावण्याच्या अविर्भावात ते तिला म्हणालं,
 
"कित्ती चक्रम मुलगी आहेस...😌
 
Corrections कसली करतेस? ते तुझं र्हस्व-दीर्घ व्याकरण ठेव तुझ्यापाशीच...
 
असोशी आणि आवेगाने मनातलं काही सांगू पाहणं याचीच फुलं होतात वेड्या...
 
त्यांना उमलू द्यावं ...
मुळीच correct न करता...
 
आणि ...
 
निरपेक्षपणे कुणालाही घेऊ द्यावी
त्याला 'खूडणं' न म्हणता...
 
त्या 'कोणाची' म्हणूनच ती आलेली असतात उभारून वर
थेट मनाच्या तळाचा ठाव सांगत...
 
सहज असू द्यावं ग सगळंच ...
 
शब्दात उतरली तर उतरली ...
बंध घालू नये कश्याचेच त्यांना...
 
मग बघ त्यांचं गंधाळणं तुला किती वेड लावतं ...
त्यांचा मुलायम , मृदू स्पर्श झिरपत , काही मनाशी पोचतं...
त्याचं 'रंगपण' हृदयस्थ होतं
अदृश्य पंख देत सारे 'संदेह' मुक्त करतं...
हं ☺️
उमगलंय वाटतं काही तुला..
तशी खुळीच आहेस म्हणा तू ..
पण उगीच नाही ना गालातल्या गालात हसत तू नेहेमी...
आत्ता कशी अगदी माझी fullproof फूल वाटतेयस...
 
थांब जरा निमिष मात्र , अशीच तरातरा स्वप्नातून बाहेर निघू नकोस...
 
दृष्ट लागलीये तुला की कसली
बाधा झालीये वाटेल सर्वांना...
 
जरा माती ओवाळून टाकते.."


Sunday 23 August 2020

कृष्णमयी...

  •  
     
    ग्लानीतून तिला जाग आली तेव्हा उन्हं उतरंडीला लागली होती... आताशी आपल्या सवंगड्यांसवे, गाईगुरांना घेऊन येईल तो. 
     
    'आज काय खाऊ केला आहेस लवकर दे बघू.. ' म्हणून भवती पिंगा घालेल आणि काय करू अन काय नको असे होऊन जाईल आपल्याला...
     
    अशी काय जादू आहे त्याच्या डोळ्यात अवघे जग विसरून रमून जातो आपण.
    खरेतर दटावयाचे असते त्याला उशीर केल्याबद्दल,
    दुपारी यमुनेला गेल्यावर सर्वांसमोर वाट अडवल्याबद्दल, कोणाकोणाच्या घरी जाऊन लोण्यावर ताव मारल्याच्या उगा कथा केल्या बद्दल!
     
    पण आपल्या शब्दात असे गारुड भरतो की ऐकतच राहावेसे वाटते. स्थळ , काळ , वेळाभान सगळंच कसं विसरून जातो आपण तो आला की!
    आणि तो सोबत नसताना सर्वांसोबत अन मनातही त्याच्याच गोष्टी करत राहतो.
    एकदा चुकून निघून गेलं बोलताना 'खूप मोठ्या माणसांसारख्या गोष्टी करतो' आणि या कानाचे त्या कानी होताना 'तो तिला हवे तेव्हा मोठे होतो' च्या व्यर्थ वल्गना झाल्या.
     
    किती रडलो आपण त्या दिवशी! दिवसभर वाट पहिली धास्तावून ....
     
    आला तर काय होईल आणि नाही आला तर अजूनच काही होईल..
     
    आणि आला तो नेहेमीसारखा हसत नाचत... आपल्या इवल्या हातात हनुवटी धरून म्हणाला
     
    "बरं झालं की लोक असं बोलताहेत. होऊनच टाकतो की मोठा आणि मग करून टाकू लग्न बिग्न"
    तिला एकदम हसूच आले.
     
    "लग्न बिग्न ? ते काय असते ते माहिती तरी आहे का वेड्या मुलाला?चल खाऊ केलाय तुझ्या आवडीचा.मित्रांनाही बोलाव. खूप सारा केलाय. सर्वजण मिळून खा."
     
    "कधीतरी तुझ्याही आवडीचा खाऊ करत जा की. तोसुद्धा तितक्याच आवडीने खाईन. किव्हा मीच करत जाईन. यालाच म्हणतात लग्न....."
     
    खट्याळ हसू मिरवत स्वारी निघूनही गेली आणि आपण वेड्यासारखे विचार करत राहिलो ....
     
    पण ही ग्लानी कसली ?
    आता नेमका कसा दिसतो ...कसा हसतो.. काहीच कसं आठवत नाही..
    भ्रम .. संभ्रम कसलं दाट धुकं?
     
    डोळे उघडत तिने सभोवार पाहिले.
     
    आजूबाजूचा कण न कण निष्प्राण होऊन पडला होता...माणसं, झाडं, वेली, रस्ता ,गायीगुरं , सांजवारा स्तब्ध ...जीवघेणी शांतता ...वेळभानेची काळोखी पोकळी.... बाहेर पडण्याची वाट नसलेली...त्राण गळालेली ...
    असहनिय....असहाय्य..
     
    काही दिवसांपूर्वीची ती आर्त पहाट तिला आठवली...
     
    "का ग सानिका, तुझा स्वर आज असा व्याकुळ का?" तिच्या काळजात कळ उमटली.
     
    "माझं जाणं अटळ आहे... तुला कसं सांगू..."
     
    "कुठे जाऊ शकशील मला सोडून?"
     
    "दृष्टीभ्रमापलीकडे ..."
     
    "कित्ती गहन बोलतोस? आणि का बोलतो आहेस असं? हे असंच सारं व्हायचं होतं तर हे माझ्या अवघ्या अस्तित्वाच्या कुडीत न मावणारं वेड तू का लावलंस? "
     
    "तु उत्तर जाणतेस ... "
     
    त्याच्या डोळ्यातली निरव शांतता तिच्या हृदयाला पार चिरून गेली.
     
    आत्ताही तिला हे सारं आठवलं आणि वर्तमानाचा संभ्रम पडला.
     
    काही वेळापूर्वी असं रथाचे चाक अडवून उभे होतो आपण...
    एरवी आपल्या चेहेऱ्यावरच्या दुःखाच्या , अस्वस्थतेच्या एका पुसट रेषेनेही विस्कटणारा तो आज किती निश्चल, निश्चयी, ठामपणे रथ हाकायला सांगत होता.
     
    कोणीतरी त्याचे रूप घेतलेला बहुरूपी म्हणावा तर त्याच्या सुरेल अंतःकरणाचे सोंग कुणा पेलू शकेल...त्याचे सुंदर हृदय डोकावणारे लोभस डोळे कोण लेऊ शकेल?
     
    तोच होता... आणि त्यानं सांगितले होतं ...
    हे अटळ आहे ... त्याची आपली भेट जितकी अटळ ...तितकाच भेटीनंतर वियोगही .... आणि जीवघेणा विरहही..
    तात्पुरता ..की कायमचा ?
    कोण सोडवील हे कोडे...त्याच्याशिवाय कोण सोडवू शकेल..?
    पण तो...पोहोचण्याच्या सर्व शक्यतांच्या पार गेलेला..
     
    अजून काय बरं म्हणाला होता तो.?.. तिने कशोशीने आठवायचा प्रयत्न केला.
    पीळ पडलेल्या हृदयातून ,त्याच्या आठवणींच्या घनदाट जंगलातून..मनभर विखुरलेल्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जोखत जाताना तो आता असणार नाही या भयाण जाणिवेला कसं सामोरे जायचं?
     
    आणि तिला आठवले..
    त्याचे आश्वासक डोळे .... तिच्या मनाचा ठाव जाणणारे... हृदयीचे गुज ऐकणारे...
     
    "माझ्या सानिकाचा इतका का दु:श्वास करतेस?"
     
    "ते तुला नाही कळणार...दु:श्वास नाही ... खूप हेवा वाटतो.. आपल्याला इतके निर्व्याज राहता येत नाही याचे ... इतके समर्पण कधी तरी शक्य होईल का आपल्याला याचे उत्तर 'नाही' मिळते त्याचे दुःख असते ते ... "
     
    "तुम्हाला दोघींना मिळून खरंतर 'मी' खेळावा लागणार आहे पुढे.. "
     
    "म्हणजे रे ?"
     
    त्याने नेहेमीप्रमाणे पाव्यावर ओठ धरले आणि काही काळापुर्वीचे गूढ बोलणे आपण विसरून गेलो...
     
    काय होता त्याचा अर्थ .?...
    मनाशी विचार करताना तिला अचानक अवसान आले आणि ती धावत यमुनाकिनारी गेली ..
    तिथे त्याच्या सुकुमार पाऊलखुणा रेतीत तश्याच उमटून राहिल्या होत्या ...
    तो नेहेमी बसायचा तो दगड आणि त्याची प्रिय 'सानिका'..
     
    तिला खूप भडभडून आलं ....
    सांजवेळा मावळतीला लागतानाचा कातर स्पर्श तिला सहन होईना ..
    आंतरिक उमाळ्याचे कढ रिचवत
    तिने बासरी हातात घेतली ...
     
    बासरीवर रेंगाळलेला त्याचा अमीट स्पर्श तिला कणभर उभारी देऊन गेला...
     
    तिने बासरी प्राणपणाने ओठाला लावली पण त्यातून सूरच उमटेनात ....
    तो तर सोबत आपले श्वासही घेऊन गेला....
     
    क्षितिजावर एक एक करत चांदणी उमटू लागली आणि काळोखात काही सावल्या भास वाटाव्या इतक्या ओळखीच्या ... तिला काही सांगू पाहणाऱ्या ... सुचवू पाहणाऱ्या ..
    आणि अजमावू पाहणाऱ्या..
     
    आणि दृष्टीभ्रमापलीकडे उभा होता तो ... तितकाच मिश्कील हसत ... आपले खट्याळ डोळे रोखून ...
    तिला हर्षोल्हासाचे भरते आले... आणि अधराच्या पाकळ्यांमधून मुक्त झालेला तिचा श्वास सानिकेसोबत संगीत खेळू लागला ...
     
    प्रेमविलापाचे आर्त स्वर ..वाऱ्यासोबत इतस्थत: पसरू लागले .. आणि तिच्या दुःखावेगाचे निरूपण होऊ लागले..
     
    दूर गेला तरी कुठे कुठे आणि किती किती भरून राहिला होता तो...
    आजूबाजू सर्वत्र आणि आपल्या आतही तोच .. ..
    इतके तादात्म्य इतकी एकरूपता तो असताना कधीच कशी जाणवली नाही?
    की समझावत होता तो हेच सारं आपल्या अगम्य भाषेतून आणि आपण मात्र आपल्या मायेच्या धुक्यातून .. निरर्थक बंधने माळून... बाहेरच पडू पाहत नव्हतो..
     
    आता मात्र सानिका मुक्तपणे आनंद बरसवत होती ... ती स्वतःच त्यात इतकी रंगली होती की जणू खऱ्याखोट्या कुठल्याच उत्सर्गाची गरजच मिटावी ...
    यमुनेच्या पाण्यात मंत्रमुग्ध लाटा अविरत खेळू लागल्या .. उमटणारे उत्कट जलतरंग...
     
    आजूबाजू वृक्ष , वेली , आणि अंधार लयबद्ध ...अवघा आनंद, काळ स्थानबद्ध ..
     
    उत्तररात्रीला पारिजात शुभ्र आनंद ढाळु लागला आणि ती भानावर आली ... ही इतकी सगळी जादू आपल्याला त्यानं कधी बरं शिकवली ?
     
    ती वेगात निघाली बेभान , सैरवैर .... आता थांबून चालणार नव्हतंच..
    वाटेतल्या प्रत्येक कणाकणाला , अणूरेणूला 'संजीवन भान' देत ... मृत , अवकळा आलेल्या प्रत्येकाला नवजीवन देत ..
     
    आणि पहाटेच्या पहिल्या प्रहरी 'त्याच्या जाण्याचा.. त्या दुःखाचा' विसर पडावा इतकं सारं पूर्ववत ... तिचा विश्वास बसेना ..
     
    त्याच्या विरहाच्या दुःखात चूर होताना हे पुनर्निर्मितीचे दान आपल्या ओंजळीत टाकून...
     
    शेजारी उभा तो...
     
    तितकाच सहज... 
     
    तितकाच निरागस...
     
    तितकाच 'तिचा'
     
    आणि
     
    ती त्याची 'कृष्णमयी'....
     
     

Wednesday 22 July 2020

ती'ची मुक्तिकथा





पहाटेच्या दुलईत रात्र मिटू लागली होती..धुक्यात अवघे जग मंत्रून झोपी गेले होते....
 
तिच्या पहाटेच्या नित्याच्या कामांना मात्र वेग होता... कारण आज तिचा तो तिला भेटणार होता...जगाच्या नजरेंपलिकडे...
 
दळणकांडण उरकून , गाईगुरांच्या धारा काढून, त्यांना चारा सरकवून ती वेगाने निघाली...
बेभान ...अस्वस्थ..उत्सुक... थोडीशी धास्तावलेली...
 
आणि नदीकाठी तिला 'तो' तिची वाट पाहत असलेला दिसला.... तिच्या धाप लागलेल्या शरीराभर एक गोड शिरशिरी उमटली.....
 
पण नेहेमीच्या आवेगाने तो जवळ आला नाही...मग ती तिच्या प्रेमभरल्या असोशीने जवळ गेली..
 
"हे काय आज काही बोलायचे नाही वाटतं..." तिच्या काळ्याभोर डोळ्यात दुःख उमटलं..
 
"वेडे, तुझा माझा संवाद-संबंध हा किती जुना अग... ही आजची का गोष्ट आहे?"
 
"बोल ना काहीतरी.. खूप ऐकावेसे वाटतं आहे ...."
 
"बरं चल, आज वेगळया भाषेत बोलू....."
 
"पण मला तर प्रेमाची सोडून कुठलीच भाषा येत नाही की..."
 
तिच्या गोंधळलेल्या आविर्भावावर तो नेहेमीसारखा गोड हसला. गालावर एक टिचकी वाजवत म्हणाला,
 
"जा तिथे पलीकडे बस.मी इथं या दगडाशी बसतो."
 
"हे काय? एवढ्या लांब मुळीच नाही हं...का छळतोस?.."
 
"लांब? दिवसभर सोबत नसतेस तेव्हा लांब असतेस वाटतं..?"
 
तो एक मिश्किल हसू फेकत म्हणाला आणि ती लाजेने चूर झाली. जाऊन पल्याड जाऊन पाण्यात पाय सोडून बसली.
 
"हं.. बोल आता"
 
पण तो शांत बसला होता...ध्यानस्थ...स्थिरचित्त .. अविचलीत..आत्ममग्न...
 
एकाच प्रेमबंधनात राहून हा इतका कसा स्वस्थ, शांत कसा राहू शकतो..?.तिला परत एकदा नव्याने वाटून गेलं...
त्याने त्याच्या पाव्याला ओठ लावले होते.
 
तिला क्षणभर त्या 'सानिका' चा प्रचंड हेवा वाटला... वाटलं असेच एकादाच आपल्यातही प्राण फुंकून टाकून हा मुक्त का करत नाही आपल्याला...?
रोज एक अस्वस्थ, कासावीस तहान होऊन जगतो आपण...
 
पण त्याने सूर लावला होता आणि तो अलगद तिच्या मनाला भिडला तशी ती मंत्रमुग्ध झाली..
आणि सूर वाहत राहिले तिच्या अवतीभोवती ...तिच्या अंगाशी खेळत... तिला सुखतीशयाने फुटून जाणार असं वाटू लागले.
 
कळू लागली तिला ही शब्दांपलीकडची सूरभाषा...
 
"अजून पूर्णत्वाने नाही आलीस इथं तू..."
 
"....कशी येणार ..?वर्तमानाचं भान कसं सोडणार..?."
 
"मोकळा कर तुझा तो केशसंभार ज्यात तू कितीतरी बंधने माळून आली आहेस..."
 
"असे कसे करणार अरे..मी परत कशी जाणार मग?"
 
"मी जाऊच देणार नाहीये तुला परत..."
 
त्या लडिवाळ प्रेमाने ती तृप्त हसली...
 
बासरीचे सूर अलगद तिच्या एक एक बटा सोडवत केशसंभार पाठीवर पसरवू लागले. आणि प्रत्येक बटे सरशी ती मुक्त होऊ लागली...नदीकाठचा वारा तिच्या केसातून वाहून तिची गात्रे शांत करू लागला..
 
उगवतीला नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं... यमुनेच्या श्यामवेल्हाळ जलात तिचं अस्पष्ट प्रतिबिंब तिला हिंदकळताना दिसू लागलं....
 
"मी एवढी सुंदर दिसू शकते..?"
तिचा तिच्यावर विश्वास बसेना..
 
"तुझ्या माझ्याठायी रत असलेल्या आत्म्याची प्रचिती नाकारू नकोस वेडे... मला तू नेहेमीच अशी दिसतेस.."
 
"नेहेमी? कित्ती खोटं ....तुला मी एरवी आठवते तरी का?"
 
लटक्या रागाने ती म्हणाली,
 
"कुठूनही उगम नसताना अचानक वाऱ्याची झुळूक कुठून येते ...?
गंधभरल्या फुलांची ओंजळ हुंगुन जेव्हा हृदयाशी धरतेस तेव्हा तुझ्यासाठी ते स्वत्व इतक्या नितळपणे तुला कोणी पाठवलेलं असतं..?
रात्रीच्या निरव प्रहरी अलगद जाग येते तुला आणि आधाराला शोधतेस तो शाश्वत श्वास घेऊन कोण उतरतं तुझ्या मानत...?
मी सोबत नसतानाही तुझ्या इवल्या हृदयाची धडधड कोण शांतावतं.. ?
तुझ्या अवघ्या अस्तित्वाला कोण वाहतं ठेवतं?"
 
"तुझेच कुटील प्रश्न अन तुझीच लोभस उत्तरे ..."
 
बासरी आता समेला पोहोचली होती. मंतरलेल्या मुग्ध स्वरात आता ती विरघळून जाऊ लागली होती.
 
तिचे अणुरेणू तिच्याच नकळत विरळ होऊ लागले...
पायाशी असलेल्या यमुनेच्या पाण्यात मिसळून जलमय झाले...
नदीकाठच्या मऊ मृत्तिकेत तिचे काही कण अलगद मिसळून गेले...
भवताल वाऱ्यात उधळून जात 'ती' अवकाश झाली..
सगळ्या मर्यादा, बंधने , सुख , दुःख मागे सोडत आनंद विभोर झाली..
 
कुठे राहिली ती तिची, त्याची किव्हा कोणाचीच?
 
आणि या सर्वाचा कर्ता 'तो' मात्र सवयीने अंतर्धान पावला ...
 
इकडे गावात आवई उठली ...भल्यापाहटे 'ती' नाहीशी झाली...काठावर फक्त तिची वस्त्र आणि आभूषणे मिळाली....
 
आणि एक कथा...
 
काही 'ती' ना मात्र गूढ वाटत नसलेली..
त्यांचे केशसंभार सुटून मुक्त करू पाहणारी...

Friday 12 July 2019

वेळभान आणि सजग-मिती


आमच्या घरातले सकाळचे रोजचे चित्र! रोज माझी कट्ट्याशी पोळी करायला उभी असण्याची आणि आमच्या बाईंची फरशी पुसायची वेळ एकच येते. प्रत्येक वेळी तिच्या कामात व्यत्यय येऊन तिचा वेळ आणि मुख्य म्हणजे कामाचा tempo मोडणार नाही याची काळजी घेत मी बाजूला होते किव्हा कधी पोळी तव्यावर असेल तर त्यांना 'थांबा हं २ min एवढी पोळी उतरवून बाजूला होते.' असे आवर्जून सांगते. त्या पण तसेच थोडेसे इकडचे तिकडचे पुसून घेत नेहेमीच adjust करतात जेणेकरून आम्ही दोघीही आपापल्या कामाचा tempo राखतो.
म्हटला तर साधासाच रोजचा प्रसंग, पण आज त्या स्वतःहून म्हणाल्या "अहो २च पोळ्या राहिल्या होत्याना . होऊ द्यायच्या होत्या मी थांबले असते की! "
त्यावर मी त्यांना म्हटले "अहो ही २ mins पण खूप महत्वाची असतात तुमची ते माहिती आहे मला. खूप काम असते ना तुम्हाला."
"हो ना रोज २-२:३० होतात घरी जायला. पण तुम्ही ताई मला कधीच थांबवत नाही." असे म्हणत त्या छान हसल्या.
आपल्या वेळेचा समोरच्याकडून होणारा आदर नेहेमीच मनाला सुखावतो आणि मग समोरची व्यक्तीही तुमचा वेळ आणि मन जपायचा तितकाच प्रामाणिकपणे प्रयत्न करते. व्यक्ती कितीही छोटी किव्हा मोठी असो तिला दिवसातले मोजून २४ तासच मिळत असतात आणि करत असलेले काम हातावेगळे करून मग थोडेसे का होईना विसावू असा प्रत्येकजण विचार करत असतो. म्हणून जेव्हा समोरच्याच्या कामात खारीचा वाटा किव्हा निव्वळ आपल्याशी निगडित असलेला वेळ कमी करण्यात जरी आपण थोडीफार मदत करू शकलो किव्हा तसे करण्याची भावना जरी प्रामाणिकपणे पोहोचवू शकलो तरी तो त्यांच्या मनाचा विसावा होतो. आपल्या थोड्याश्या जागरूकतेने आणि समोरच्याविषयीच्या आत्मीयतेच्या भावनेने असे किती तरी क्षण आपण सुखाचे करू शकतो. कारण मग वेळेची जपणूक फक्त वेळेचीच न राहता त्या त्या वेळी होणाऱ्या संवादातून होणाऱ्या भावनिक देवाणघेवणीची असते ही होत असते.
मी कंपनीत काम करायचे तेव्हा card recorders लागण्याआधी , gate वर I-Cards चे check up ही अगदी नित्याचीच बाब असायची ! पण काही जण मात्र इथून रोजच जातॊ तरी रोजच काय check करायचे असते असा तक्रारवजा नाराजीचा स्वर लावत, कधी gate शी थांबून मग guards नी विचारल्यावर मग बॅगेतून शोधून मग ते गळ्यात अडकवणार, मग त्याबरोबरीने स्वतःच्या आणि पर्यायाने security guard च्या दिवसाची सुरवात खराब करणार.
मी आवर्जून bus companyच्या जवळ आल्यावर आधीच card गळ्यात घालायचे . मग जेव्हा कार्ड तपासणीचा प्रसंग यायचा तेव्हा की स्वतःहून कार्ड पुढे करून मग बॅग उघडून दाखवायचे . ते checking चे अर्धे मिनिटे मग छान हसत खेळत संभाषण व्व्हायचे. काही दिवसांनी त्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच होऊन गेल्या. खूप ओळखीचे झाले तरी card बघणे आणि चेहेरा न्याहाळणे हे सर्व त्यांच्या जोखमीच्या जॉब साठी आवश्यक असलेली प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्यांच्याकडून घडायचेच ! पण रोजच्या त्यांच्या सवयीच्या असलेल्या कामात मी माझाकडून थोडा स्वतःहून कार्ड दाखवण्याचा , बॅग उघडण्याचा हातभार लावताना , त्या संभाषणात शब्दांपलीकडचे 'We care for each other's time' असे जे काही exchange व्हयायचे जे मला महत्वाचे वाटायचे. कधी तरी मला call ला पळायचे चे असायचे तेव्हाचे नुसते हसूही मग माझ्या दिवसाची सुरुवात सुंदर करायचे.
Canteen मध्येही कॅश कॉउंटरवरचे लोक एरवीच खूप fast काम करतात पण काही लोक मोठी रांग असतानाही कॉउंटरशी पोहोचल्यावर मग आरामात मेनू पाहत मग पाकीट काढून मग पैसे काढतात. रांगेत उभे असतानाच एक नजर मेनूवर टाकून आपल्याकडे नेमके सुट्टे पैसे आहेत किंवा बंदे रुपये आहेत याचा अंदाज घेत कॉउंटरवर थेट व्यवहार केला तर counter वरच्या माणसाचे २ क्षण आपण विसाव्याचे करू करू शकतो ना. कोणी म्हणेल ते त्यांचे कामच असते आणि अश्याने असा कितीसा वेळ rather अश्या seconds च्या वाचवण्याने नेमके काय होणार आहे. पण मला वाटते माणसाला नेहेमीच हा काही सेकंदांचा का होईना 'Me Time' हवा असतो. आणि कोणीतरी आपले काम सुसह्य करण्यासाठी छोटासा का होईना प्रयत्न करते आहे ही भावनाही सुखावह!
एकदा माझी आतेभावाची बायको वैशालीवहिनी पहिल्यांदाच घरी आली होती, टेबलाशी बसत आईशी गप्पा मारत तिने सहज भांड्यात ठेवलेल्या मटारच्या शेंगा सोलायला सुरुवात केली.
आईने "अग हे काय पहिल्यांदाच आली आहेस आणि काम कसले करतेस?" असे म्हणताच सहज म्हणाली
"अहो फार काही नाही करत आहे मी . आणि गप्पा मारताना होऊनही जाईल. तेवढीच जरा ५ मिनिटे तुम्हाला मोकळीक."
तेव्हाही कामापेक्षा कोणीतरी आपला विचार करते आहे, माझ्या वेळेचा विचार करते आहे ही भावना आईला नक्कीच सुखावली असेल आणि वैशालीवहिनी हे विसरूनही गेली असेल पण या साध्याशाच वागण्यातून प्रतीत होणारा समोरच्याविषयीचा जिव्हाळा हा एक गोड आठवण म्हणून आम्हा सर्वांच्याच लक्षात राहिला.
एरवी आपण आपल्याच विश्वात रममाण असतो आणि आजकाल तर watsapp आणि facebook सारख्या आभासी जगात वेळेचे भान आपण खरोखरीचेच हरवून आहोत असे वाटते. एक आयुष्य आणि त्यातला एक एक क्षण किती खास आहे ही जाणीव हरवत चालली आहे. वेळ सरणे आणि वेळ सारणे यातला फरकच आपल्याला कळेनासा झाला आहे. मान्य आहे, रोजच्या एक मिनिटही इकडे तिकडे हलवू न शकण्याच्या गच्च routine ने भरलेल्या दिवसात आपणच आपले विसाव्याचे क्षण शोधत राहतो पण हा विसावा म्हणजे क्षणभराचा न होता आपण त्यातच हरवून जातो आणि मग वेळच नाही असा बाऊ करत राहतो .
मध्यंतरी एक छोटासा लेख वाचनात आला . त्यात एक प्रसंग सांगितलेला होता . एक आजोबा बऱ्याच वेळ एक चेक हातात घेऊन एका रांगेत उभे होते. आणि कॉउंटरशी गेल्यावर काउंटरपलीकडील माणसाने त्यांच्या लक्ष्यात आणून दिले की तो चेक दुसऱ्या बँकेचा आहे. त्यांचा मोलाचा वेळ आणि रांगेत उभे राहण्याची शक्ती वाया गेली होती. पुढे मागे उभे असलेल्या एकाने तरी सहज लक्ष दिले असते तरी हे खरच टळण्यासारखे होते पण आजकाल वेळ मिळेल तेव्हा कुठेही असले तरी लोक खरच watsapp , facebook किव्हा game खेळू लागतात. यासर्वात आपण छोट्या गोष्टी हुकतो आहे ,आजूबाजूचे आत्मभानच हरवतो आहे असे नाही का वाटत?
आपल्या अस्तित्वाच्या त्रिमितीला वेळेचे चौथे परिमाण लावताना आजूबाजूच्या चाललेल्या गोष्टींमध्ये आपण नेमकी काय भूमिका बजावू शकतो याचे सजग भान आपल्याला यायला हवे , थोडासा स्वतःचा वेळ मोडून समोरच्याचे काही क्षण सुसह्य व्हावे यासाठी जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा. आणि मग असे कुठल्याही आभासी माध्यमांचे अंकित नसलेले मोकळे क्षण केवळ मनातच साठणाऱ्या आणि कधीही हाताशी लागणाऱ्या आठवणी बनून जातील.
मीपणाच्या कक्षा जराश्या रुंदावत कोणासाठीतरी वेचलेले काही साधेसेच क्षण तुमची स्वतःची ओंजळ नक्कीच आनंदाने भरतील!

#मेधालाडदेशपांडे
#TimeisMuchMoreThanMoney
#मीपणाच्याकक्षा

आपला माणूस आणि रोजच्या जगण्यातली प्रेरणा

एकुणातच यंदाची निवडणूक , त्याची प्रचार भाषणे , exit polls आणि आजचा निर्णायक दिवस या सर्वाचाच मिळून गेले २-३ महिने एक जल्लोषाचा माहौल बनून राहिलेला आहे. राजकारणाशी रोजचा संबंध नसलेला सामान्य माणूसही ही आपलीच लढाई असल्यासारखा जिकंण्याचा उत्साह अनुभवतो आहे. हा विजय त्याला आपला वाटतो आहे.
आपल्यासाठी कोणीतरी चांगला विचार करतो आहे , त्यासाठी विविध योजना त्याने खूप साऱ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत अमलात आणल्या आहेत. भलेही त्यातल्या काहींची आत्त्ता सुरुवात आहे , त्याची फळे चाखायची आहेत पण कोणीतरी स्वार्थापुढे राष्ट्रहिताच्या विचार मोठा ठरवत आपला विचार करतो आहे हेही त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या सय्यमशील , अनुकरणीय वर्तनाने जणू त्याने 'राष्ट्रभक्ती' जनमानसात फुंकली आहे जेणेकरून आपापले काम नेटाने, प्रामाणिकपणे करण्याची प्रेरणा आज जागली आहे.
निवडणूक निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही माध्यमे , आणि रस्त्या रस्त्यावर लोक हा उत्सव आधीच मनवत आहे. एवढे प्रेम आणि आपुलकी क्वचितच कोणा नेत्याला मिळाली असेल.
ही जादू घडवून आणणाऱ्या माननीय पंतप्रधान मोदी यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा व हार्दिक अभिनंदन!🙏🙏🙏😇
सत्तेवर आल्यापासून पहिल्या दिवसापासून किम्बहुना त्याही आधी पासून समर्थकांच्या अपेक्षा , विरोधकांचा विरोध , दुर्बीण घेऊन त्यांच्या प्रत्येक कृतीची न्याहाळणी, तपासणी , आरोप , टीका यासर्वांना ते पुरून उरले आहे आणि तितक्याच ताकदीने चोख अंमलबजावणी करत प्रसंगी जनरोषाचा धोका पत्करत कितीतरी योजना राबवल्या आहेत. आणि म्हणून हा जल्लोष कोणीतरी 'आपला माणूस' जिंकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. हा प्रत्येकाला भावनात्मक विजय वाटतो आहे.
एरवी मी राजकारण या प्रकारापासून चार हात लांब असते पण मोदीजींची भाषणे आणि मुलाखती आवर्जून बघते कारण त्यातून मला रोजच्या जगण्याला प्रेरणा देणारे खूप काही सापडले आहे. त्यातले काही आजच्या दिवसाचा जल्लोष म्हणून.
एका कुठल्याश्या लोकसंवादात एका कॉलेजातल्या तरुणाने मोदीजींना विचारले
"तुम्ही एवढे अथक काम करता. अजिबात सुट्टी घेत नाही. खूप सारा प्रवास करता. जाईल तिथल्या लोकांसोबत संवाद साधता. तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?"
त्याचा हा निरागस प्रश्न ऐकून पूर्ण सभागृह हसले. मोदिजीही हसले आणि म्हणाले
"अरे मी एक नाही दोन नाही पाच पण नाही रोज लोकांच्या २० किलो शिव्या खातो."
असे म्हणताच सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
खरच चांगले काम करणाऱ्या या माणसाला रोजच कितीतरी आरोप , टीका , निंदा सहन करावी लागते. विरोधक विरोध करायचे थांबत नाही आणि हा माणूस त्य
गोष्टींना सकारात्मकपणे हाताळत आपले काम नेटाने करत करत राहतो.
कोणी त्यांना 'चौकीदार चोर है' म्हणत अवहेलना केली त्यांनी त्याचे 'मै भी चौकीदार' आंदोलन करून टाकले आणि देशभरात सर्वच जण चौकीदार बनून काम करू लागले.
कोणी त्यांना 'चायवाला' म्ह्णून हिणवले त्यांनी त्याची 'चाय पे चर्चा' सुरु करून टाकले.
कोणी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून केले त्याला त्यांनी 'नजर लागू नये म्हणून आईने लावलेला काळा टिका' करून टाकले.
कोणी म्हणाले 'Modi Go Back' त्यांनी 'मला पंतप्रधानपदासाठी परत जायला सांगताहेत' म्हणून टाकले.
एका मुलाखतीत त्यांना विचारले "आम्हा सामान्य माणसांना काम करून जेव्हा कोणी टीका करते तेव्हा खूप वाईट वाटते. तुम्ही ही दररोजची टीका कशी हाताळता"
त्याला त्यांनी दिलेले उत्तर रोजच्या आपल्या जीवनात आपण टीका कशी स्वीकारावी याचेच द्योतक आहे.
"एवढा मोठा देश आहे एवढे मोठे काम आहे तर टीका होणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यातून कमतरता पुढे येतात त्यावर तुम्ही काम करून प्रगती करू शकता. खरे पहिले तर टीका खूपच कमी होते आहे. कारण आपल्या इथे टीका नाही आरोप होतात आणि विरोधासाठी विरोध होतो याचे दुःख आहे. टिकेकडे मी लक्ष देत नाही"
खरंच टीका आणि आरोप यांचे योग्य विश्लेषण करता आले की प्रगती ही किती ऑटोमॅटिक आहे नाही.
टिकेकडे लक्ष्य देत नाही हे म्हणणे सोपे आहे पण ते प्रत्यक्षात आणणे, गेल्या ५ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता आणि तोच वेळ खरे काम करण्यात सत्कारणी लावणारा नेता म्हणून मोदीजी खरच अनुकरणीय आहेत.
'तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?' या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक सुंदर रूपककथा सांगितली.
एकदा हिमालयात एका तळ्याकाठी एक संन्याशी तप करत बसलेले असतात. तिथल्याच एका छोट्या टेकडीवर त्यांना एका ८ वर्षांची मुलगी आपल्या ३ वर्षांच्या भावाला पाठीवरून घेऊन जाताना दिसली.
"बेटा तुला ओझे नाही होत आहे का ?"
ती हसत म्हणाली "हा तर माझा भाऊ आहे."
"बेटा मी तुला तो कोण आहे ते नाही विचारत नाहीये. तुला ओझे नाही होत आहे का "
ती परत हसत म्हणाली "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे."
थोडेसे चिडून त्यांनी तिला परत विचारले "बेटा अग मी तुला केव्हापासून विचारतो आहे तुला त्याचे ओझे नाही होत आहे का ?"
ती खूपच हसायला आले "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे. याचे ओझे मला कसे वाटेल?"
पूर्व देशाची विश्वासार्हता आपल्या पाठीवर वाहून नेऊन देशाला आशेचा नवा सूर्य दाखवणाऱ्या , त्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र अविरत कष्ट करणाऱ्या मोदीजींना पुढील कार्यकाळासाठी म नःपूर्वक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!🙏🙏🙏
सर्व देशवासीयांचे प्रेम आणि पाठबळ असेच तुम्हाला कायम मिळत राहो!!🙏
- सौ. मेधा कौशल देशपांडे
#मेधालाडदेशपांडे #narendramodi #namonamaha

Wednesday 8 August 2018

बोकोबा आणि लोणी

आज सकाळचीच गोष्ट. बरे नसले कि अभिनयासकट गोष्ट रंगवून सांगत खाऊ भरवावा लागतो तरच तो जातो.
आजी आणि आबा मिळून युगंधरला कृष्ण आणि दहीहंडीची गोष्ट सांगत होते. कंस कसा दुष्ट होता सगळे गोकुळातले दूध त्याच्याकडे मागवायचा आणि कधी घाबरून तर कधी चांगल्या मोबदल्यासाठी मग गोकुळातले लोकही आपल्या पोराबाळांना खाऊ-पिऊ न देता दूध-दुभते तिकडे पोहोचते करायचे. त्याच्या मित्रांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता. आणि हे अन्यायाचेही होते.
दही गुसळून केलेलं लोणी शिंकाळ्यावर काढून ठेवायचे. ते असे वर बांधलेले असायचे. गोष्ट जोरात सुरु होती.
"शिंकाळे म्हणजे काय?"
एवढ्यात जिया म्हणजे आजी काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेली. आणि
आबांनी 'शिंकाळे' या गोष्टीचे सगळे दाखले द्यायला सुरुवात केली.
म्हणजे
"अरे ते नाही का तू खूप मस्ती करतोस तेव्हा बाबा म्हणतो ना 'शिंकाळ्यावर टांगून ठेवीन'. आणि अरे ती म्हण आहे ना 'बोकोबाची नजर शिंकाळ्यावरच्या लोण्यावर'. म्हणजे अरे बोकोबा असतो ना त्याचे घरात सगळीकडे लक्ष असते. लोणी करताना तो बघतो आणि मग वाट बघत असतो कि कधी मला त्यावर ताव मारता येईल."
यांचे हे 'शिंकाळा' पुराण संपता संपता आजी आली आतून आणि मग कृष्ण आणि त्याचे साथीदार यांच्या गप्पा गोष्टी परत चालू झाल्या.
" तर अरे कृष्ण म्हणजे गोकुळचा राजाच. त्याच्याकडे दुधातुपाला काही कमी नव्हती. पण आपल्या सवंगड्याना ते मिळावे म्हणून मात्र तो त्यांच्या घरी जाऊन कोणी घरी नाहीसे पाहून चोरी करत असे. म्हणजे काय असे खाली ४-५ जणांनी उभे राहायचे त्यावर अजून थोडे मग त्यांच्या खांद्यावर अजून काही मुलं असा पिरॅमिड करायचे आणि सरते शेवटी कृष्ण वर चढून ते लोण्याचे मडके खाली आणायचा आणि मग आपल्या सर्व मित्रांना आपल्या हातानं प्रेमाने यथेच्छ खाऊ घालायचा. "
"आणि मग त्या बोक्याला दिल कि नाही."
"ऑ , कुठल्या बोक्याला ?" आजी बुचकळ्यातच पडली.
मग आबांनी त्याला ती म्हण आत्ताच सांगितल्याचे सांगितले आणि आम्ही सर्व हास्य कल्लोळात बुडून गेलो.
किती निरागस असते चिमुकल्यांचे भावविश्व. खूप सगळ्या गोष्टी त्यात सहज सांधलेल्या असतात. आपल्या वाटते ही कुठली लिंक कुठे आली पण प्रत्येकच गोष्टीमागचे त्यांचे विचार सुसंगत असतात आणि त्यांना त्यांची त्यांची यथायोग्य कारणंही असतात.
युगंधरच्या जन्माच्या आधीचे माझे आणि कौशलचे फोटो कधी पहिले तर जरा रागच यायचा युगंधरला. 'तू तेव्हा नव्हतास' असले सत्य तर अजिबात आवडायचे नाही. 'जवळच खेळत असशील' असे सांगणेही पटायचे नाही.
"मग तुम्ही मला न बोलावता आपला आपला फोटो काढलात ना" असले गम्मत आणि ज्याचे तुम्ही काही केल्या सांत्वनच करू शकत नाही असे भांडण सुरु व्हायचे.
मग मीही फार फाटे न फोडता 'अरे तू आहेस फोटोत पण माझ्या पोटात आहेस' असे सांगायला सुरुवात केली. आणि पोटात का होईना पण आपण आहोत फोटोत असल्या गमतीशीर समाधानात पुढे पुढे असले प्रश्न बंद झाले.
मग एकदा आईच्या घरी कुठलेसे फोटो बघत होतो. एका फोटोत मी, कौशल , युगंधर, माझी आई , भाऊ आणि वहिनी होते.
कोणीतरी म्हणाले
"अरेच्या यात पुणे आबा (माझे बाबा) नाहीयेत वाटत. "
क्षणार्धात युगंधर म्हणला
" फोटोत दिसत नाहीयेत पण पुणे आबा माझ्या पोटात असणार."
आम्हाला सर्वांना हसून हसून वेड लागायचे फक्त बाकी राहिले होते.
माझे बालपण 'दापोली' या सुंदर गावात गेले. कौलारू घर, आजूबाजू पेरू, चिंच , आंबा , डाळींब , चिकू, केली याची भरगच्च झाडे. विहीर आणि त्याच्या भोवतीच्या गमती. पाठचे शेत. एकीकडे मलये आजी आजी तर दुसरीकडे बर्वे आजी अशी प्रेमळ उब. अशा सगळ्या आठवणी कधी गोष्टी म्हणून तर कधी गम्मत म्हणून युगंधरला मी नेहेमी सांगत असते. तो हि आईचे 'बालपण' कसे असेल याचे चित्र रंगवून पुन्हा पुन्हा सांग असे सांगत राहतो.
मग कधी माकडाची टोळी यायची आणि मग मी आणि पियुष (माझा भाऊ ) कसे डबे वाजवत त्यांना पळवून लावायचो हे सांगताना प्रश्न आला.
"मग मी कुठे होतो तेव्हा?"
"अरे माझ्या लहापणी तू नव्हतास ना मीच लहान होते तर."
"अग म्हणजे दापोलीत नसेन पण कुठेतरी असेनच की" ( तू नव्हतास हे उत्तर अजिबात आवडले नव्हते.)
"अरे मग तुला पण घेतो आमच्या team मध्ये. तू, मी आणि पियुषमामा तिघे जण डबे वाजवायचो." काय कळी खुलली होती विचारात सोय नाही. पियुषला पण बजावून ठेवले होते थोडे दिवस लहानपणचे काहीही निघाले कि त्यात युगंधरला घेऊन सांगायचे.
मग २ वर्षांपूर्वी दापोलीला जायचा प्रसंग आला. युगंधरला घेऊन पहिल्यांदाच जाणार होतो. फोनवर 'हॉटेल बुकिंग झालेय' असे काहीसे बोलताना त्याने ऐकले.
फोन संपल्यावर म्हणाला,
"अग तुम्ही दापोलीला हॉटेलमध्ये राहायचात का?"
" नाही रे का ?"
" मग आपण उद्या तुझ्या मलये आजीच्या शेजारच्या त्या घरी राहायला जाणार आहोत ना ते घर नाही हॉटेल आहे का? तुझे मलये आजी, बर्वे आजी, पेरूच्या झाडावरची माकडे सगळे भेटतील ना मला. "
मला २ मिनिट खूप गलबलूनच आल. त्याने आता आपण दापोलीला गेल्यावर आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या, ते सगळे लोक त्याला भेटतील अशी काय काय स्वप्ने रंगवली होती.
काळाच्या ओघात खूप सारे बदलतच जाते. माणसे , नाती, घर , परिसर सगळंच. त्यांना तस बदलणं प्राप्तच असत. पण आपल्या मनातलं नेमकं काय जपायला हवे ते आपणच ठरवायला हवे ना. दापोली भेटीत घराकडे चक्कर मारलीच नाही. युगंधरच्या भावविश्वातले आणि माझ्या आठवणीतले मला काहीच तसूभर सुद्धा हलू द्यायचं नव्हतं... आणि आताही आमची कृष्णाची प्रत्येक गोष्ट 'बोकोबाला' घेऊन असणार आहे बर का...

Friday 18 May 2018

बियांचे ओटीभरण

' एका हाताने नांगरताना 'ती' धान्य ओटीतून धरणीच्या पोटात पेरत जाते
आणि तेच  'धान्य ' शतपटीने वृद्धिंगत होत 'तिच्या'कडे परत येते. 
या देवघेवीचे प्रतीक म्ह्णून प्रत्येक स्त्रीची  ओटी भरण्याची पद्दत रूढ झाली असावी . जेणेकरून तितक्या मोठ्या प्रमाणात धान्य तिच्या ओटीत घालून तिचा सन्मान करावा आणि तिने ते 'सृजन समृद्धीसाठी'जमिनीकडे वाहते करावे.'

या उन्हाळ्याच्या सुट्टीत
थोडीशी या सन्मानाची जाणीव म्ह्णून ,
तप्त काहिलीसाठी हतबल चर्चा सोडून करावयाचा एक ठोस उपाय म्हणून
आपल्या चिमुरड्यांसाठी 'सृजन' संस्कारचा भाग म्हणून
'एक बी म्हणजे एक जीवन' या तत्वाशी सांगड घालत ..
आपल्या काळ्या आईची ओटी बियांनी भरुयात का ?

ऊन वाढतंय तसे watsapp आणि सर्वत्रच फळे,  भाज्या यांच्या बिया साठवून पावसात त्या रस्त्याच्या कडेला / दरीत टाकून देण्याविषयीच्या posts येत आहेत.
तोच  धागा पुढे  घेत आपण हे काम  'मिळून साऱ्याजणी ' करूयात का ?
म्हणजे आपण सर्वजणी उन्हाळाभर या वेगळ्या बिया वर्गीकरण करत साठवू. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा शाळा सुरु होईल आणि पावसाच्या पहिल्या सरी सुरु होतील तेव्हा या बिया एकत्र जमवू. मग ज्या प्रकारच्या बिया जमल्या असतील त्याप्रमाणे पोहोचवू. म्हणजे भोपळा, कलिंगड  इ. बिया कोणाच्या शेतात पोहोचवू . जांभूळ, पपई थोडे कुठल्याश्या डोंगेरावर /रिकाम्या जागी लावू. खरेतर हे सर्व करण्यासाठी आपण साऱ्या मैत्रिणींची मिळून 'वर्षा सहलच' काढूयात की! जमलेल्या बियांचे शेवटी कसे नियोजन करायचे यासाठी ज्यांना यातली माहिती आहे त्यांनी कृपया माहिती सांगावी. 
या सर्व कामाला सर्वांच्या एकत्र प्रयत्नांची जोग मिळाली तर पर्यावरणाच्या (खरेतर आपल्याच मदतीचा) एक सुंदर प्रकल्प आपण करू शकतो.
कारण रस्त्यावर/ दरीत  टाकलेल्या  बीया काही वेळा सुकून जातात , काही वेळा रुजतात आणि एकदा त्या आपण टाकून दिल्या कि परत जाऊन पाहणे किव्हा त्याची काळजी घेणे हे आपल्या कडून घडत नाही. त्यामुळे त्या बिया कोणातरी काळजी घेणाऱ्या , यथायोग्य जोपासना करणाऱ्याच्या हातात पोहोचवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मला वाटते.

तर मग काय म्हणताय 'मिळून साऱ्याजणी' करूयात ना आपल्या 'मायमातीचे ओटीभरण'?